Thursday, April 20, 2017

आजोबा

दिवा म्हणतो वात दे...
माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा हात दे... (कुसुमाग्रज)

आजोबांच्या आठवणीत असे खोल बुडून गेल्यासारखे वाटते.
त्यांच्यामुळे जे घराला घरपण होते. जसा जीवाला जीव होता, आणि माझ्यासारख्या नातीला जसा जीवनभराचा आधार वाटे ते  अचानक कुठेतरी विरघळून गेले...
कल्पवृक्ष कोसळला तेव्हा सारी पाखरे उडाली.
मी ही त्यातलीच.
मागे वळून पाहायचे नाही, असे मनाशी पक्के ठरवून फड फड करत निघाले.
आजोबा गेले होते, पण आठवणी आणि जखमा तेवढ्या होत्या.
कल्पवृक्षाखालच्या नवीन झाडांना विसरले होते असे नाही; शेवटी तेच अन्नदाते होते. पण कल्पवृक्षाच्या शक्तीशाली फांद्यांवर बेलाशक झुलणे, फुलणे काही औरच!
मी उडाले खरी, पण वृक्षासह माझे खूपसे पंखही झडले होते. मी सर्वशक्तीनिशी पुढे तर जात होते, पण खूप अंतर मात्र सर करत नव्हते.
काय असे पाश होते?
वृक्षाची एक सजीव शाखा. माझी आजी.
काही वर्षात ती शाखा ही झडली.
मग पाय मोकळे होते, पण हृदयाचे ओझे वाहणे तरीही कठीण.
आता  आई-बाबांना सोडून जायचे, तेही फक्त पंखातले बळ आजमावण्यासाठी ?
वृक्ष पडला. शब्द विरला.
पण तो पापा हवेवर तरंगत राहिला...
आजोबांचा, आजोबांसाठी.
आणि त्याबरोबर पंखात बळ हि आले. दूर उडून जाऊन परत माघारी येण्याचे.
शेवटी आपण गलबतावरचे जहाज. कारण आपण सारे अर्जुन!


No comments:

Post a Comment